मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 24 February 2018

स्वयंपाक करतांना खूप टेन्शन

मी लहान असल्यापासून स्वयंपाकापासून लांब राहायचे, 

अगदी जेवणहि असं फार मनापासून अगदी चवीने खाण्यासाठी 

आईला काही करायला सांगावे आणि खावे असे कधीच 

झाल्याचे मला आठवत नाही.लहान असल्या पासून फक्त फक्त 

अभ्यास यातच लक्ष असल्यामुळे इतर काम आणि स्वयंपाक कडे 

अगदी दुर्लक्ष ... 🤔


त्यातच काही मानसिक तयारी नसतानाच माझे लग्नही 

GRADUATION करतानाच झाले,😇👰

 नशिबाने नवरा जास्त जिभेचे लाड पुरवून घेणारा नाही म्हणून बरे झाले,🤗 

नाही तर बस्स माझं काही खर नव्हते. मला फक्त पुरणपोळी करता 

यायची,बाकी भाज्या कश्या करायच्या याची ट्रैनिंग बाकी होती. 

आईने सांगितलेले त्यांना जस आवडेल तसे बनवायचे. 

गम्मत म्हणजे मी नवीन नवरी असताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा 

पुण्यात आले तेव्हा मला सुरुवातीला स्वयंपाक करतांना खूप टेन्शन 

यायचे काय करू कसे करू म्हणून ,पण माझे बरेच टेन्शन माझ्या 

ह्यांनीच दूर केले ते मला म्हणायचे सगळ्या भाज्यांना 

मिरची,लसूण,जिरे,मोहरी फोडणी द्यायची आणि करायची भाजी, 

अजून काय लागत एवढे असं म्हणून ह्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला 

आणि मग मी छान स्वयंपाक शिकले.🤗


माझी मुले नवीन नवीन RECIPES आनंदाने खातात. एक मात्र आहे.

रोजचे नेहमीचे जेवण करायला मात्र थोडे नाक मुरडतात.

 ( शेवटी काय माझीच मुले ती ..)


खर सांगू का ? जर ह्यांनी मला समजून सांभाळून घेतले नसते तर ..... 

विचार हि करवत नाही माझं काय झाले असते. 

असो आता तरी मला बऱ्याच  छान छान पाककला येतात, 

पण काय आहे ना ! नवऱ्याची मदत न घेता केल्यामुळे ते त्यां RECIPES 

ला नको त्या R&D म्हणतात.

तुमचीच सखी 

माझे पान  

Friday, 23 February 2018

बदल हा निसर्गाचा नियम आहे.

स्वयंपाकघर हे नुसते नाव जरी तोंडावर आले तरी तेथील विविध प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळतात. मन एकदम प्रसन्न होते. स्वयंपाक घरावर पूर्ण ताबा घरातील स्त्रीचा असतो. मग ती ग्रहिणी असो किंवा नोकरदार ,,, प्रत्येक वस्तूवरून मायेने तिचा हात फिरतो. तिच्या सर्व कृतीतून कोणत्या ना कोणत्या वस्तु हाताळल्या जातात.
   सध्याचे स्वयंपाकघर हे पूर्वीचे माजघर म्हणून ओळखले जायचे. या माजघरामध्ये घरातील स्त्रीचा अधिकाधिक वेळ जात होता.सकाळी उठल्यापासून अगदी दळणकांडण तिची सुरुवात होत असे. पण या कामात गाणी म्हणजेच ओव्या गात गात ती दळण दळत असे. परिणामी मन रमत आणि कामाचा थकवा पण जाणवत नव्हता.अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग केला जात होता. त्यावर शिजवलेले अन्न रुचकर आणि स्वादिष्ट लागत असे. फुंकणीने विस्तव तयार करून जो धूर घरात पसरे त्याला  वेगळा सुगंध असे. चुलीवरची भाकरी, पिठले आणि ठेचा ही सारी अमृत तुल्य वाटे .
लोणचे,तक्कू, विविध प्रकारच्या चटण्या यांनी एक कोपरा व्यापलेला असे. माळ्यावर लपवून काही गोष्टी ठेवल्या जात.माऊलीने तूप काढवण्यास काढले की त्याचा सुवास घरभर पसरायचा.इतकी सारी कामे असली तरी सदैव आनंदी आणि प्रसन्न अशी तिची प्रतिमा होती.मुळात माजघरातील सर्व वस्तूंचा ति पुरेपूर उपभोग घेत असे.
      सध्या सर्व परिस्थिति बदलली आहे. माजघराला फक्त स्वयंपाक घराचे स्वरूप आले आहे. ऐसपैस असलेले माजघर आता छोटेसे किचन बनले. जागे अभावी कामापुरत्या वस्तूंनी जागा घेतल्या. जात्या ऐवजी मिक्सर आले. स्विच ऑन केले की दोन मिनिटात पीठ तयार. चुलीला गॅसचा पर्याय आला. खूप कमी वेळेत अन्न शिजू लागले. प्रेशर कुकर ची शिट्टी झाली की वरण भात तयार पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या चटण्या आणि लोणचे उपलब्ध झाल्याने स्त्रीचा वेळ वाचतोय .
     बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक परिस्थितीत गतीमानता असणे आवश्यक आहे.तर आणि तरच सुधारणा होण्यास मदत होते.म्हणूनच पूर्वीचे जाते,खलबत्ता,उखळ आणि चूल या सार्‍यांची जागा सुधारित वस्तूंनी म्हणजेच बदलत्या स्वरुपात घेतल्या आहेत. या बद्लामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली. मिळालेला रिकामा वेळ स्त्रीला आपल्या स्वतःसाठी देता येऊ लागला.वस्तु आधीच्याच पण बदलत्या स्वरुपामुळे घरातील स्त्रीमधे प्रगति होत गेली.फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिली नसून घरातील सर्व जबाबदारी सांभाळून इतर जोखमीची कामे करणार्‍या महिला दिसतात याचे एकमेव कारण माजघरातील वस्तूंचे बदलते स्वरूप होय.
 आजच्या स्थितीत फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिलेली नसून पुढारीत आणि शिक्षित घडली आहे. वस्तूंच्या बदलत्या स्वरूपाने हे सहज शक्य झाले आहे.

शिवांगी विजय कुलकर्णी
    संभाजीनगर                                                    


माजघर हे तीचं साम्राज्य


अपर्णा मानोलीकर ( जहागिरदार )
परभणी 

जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी।।


 खणखणीत अशा आवाजात मनिषा  मुळे यांची  '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 


मनिषा  मुळे 

औरंगाबाद 

Saturday, 17 February 2018

मुलगी जणू संस्कारच व्यासपीठ !


जरुर ऐका !

माधवी शहाणे यांची जन्मताच मुली असुरक्षित का?  या विषयावरील ऑडिओ क्लिप. 

माधवी शहाणे 
औरंगाबाद

स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे .

दिल्लीतील ८ महिन्याच्या मुलीवर रेप हि घटना मनाला चटका लावून गेली . आणि जन्मताच मुली असुरक्षित का ? असं वाटायला लागलं. पूर्वीच्या काळी मुलीचा गर्भ  वाढतोय असे कळले तर गर्भ काढण्यात येत असे, हुंडा द्यावा लागतो म्हणून  मुलीचा जन्म नको वाटायचं, कधी घरच्यांच्या दबावा मुळे मुलीचा जन्म नाकारण्यात यायचा.  पण आता मुलगी जन्मायच्या आधीच  माझ्या मुलीवर रेप तर होणार नाही ना ?  अशी भीती वाटायला लागली आहे. यामुळे मुलींच्या जन्मदर कमी होण्यास काहीच वेळ लागणार नाही.

काही घटना अशा आहेत कि  शाळा, कॉलेज, क्लासेसचा रस्ताही आता मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही असेच  म्हणावे लागेल. वर्तमानपत्र वाचायला घेतले की, हल्ली याच बातम्या जास्त असतात. आजकाल माध्यमांच्या अति खुलेपणामुळे, अतिरंजीत चित्रपट, मालिका यांचे प्रक्षेपण यांचा प्रभाव लोकांवर होत असल्यामुळे, अशा घटनांना मोकळीक मिळत आहे.

खूप दिवसांपूर्वी एक जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. आई पाहिजे, पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे , मग ....... मुलगी का नको ? पण आता अशी वेळ आली आहे कि घरात मुलगा आणि मुलगी दोघेही पाहिजेत. मुलीला आणि मुलाला समान  वागणूक  दिली गेली पाहिजे . म्हणजे यातून मुलगा मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.  दोघेही एकमेकांचा आदर करायचा शिकतील. हि सुरवात आधी घरापासून करणे आवश्यक आहे. 

मुली आणि महिलांविषयी आदरभावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी शाळा, समाज आणि कुटुंब या तिघांचीही जबाबदारी आहे. असे प्रसंग घडले तर कोणालाही न घाबरता शिक्षक, पालक समाज यांना सांगता यावा, ‘गुड टच, बॅड टच ‘ या विषयी माहिती मुलांना घरातून  शाळेतून देण्यात यावी तेही कोणतीही लाज न बाळगता. असे समुपदेशन प्रत्येक पालकांना सुद्धा करणे गरजेचे आहे. आणि शाळेत सुद्धा घेणे गरजेचे आहे. सुरक्षितता हा प्रत्येक मुला मुलीचा अधिकार आहे, कोणालाही  त्यांचे सुंदर आयुष्य विस्कटुन  टाकण्याचा किंवा त्यांचे जीवन अंधःकारमय करण्याचा हक्क नाही.


चला तर मग मुलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे शिकवुया आणि समाजाच्या विकृत गुन्हेगारी पासून दूर ठेवूया.

सीमा लिंगायत कुलकर्णी

पुणे

पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे

"जन्मताच मुली असुरक्षित" विषयचा  विचार येताच मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात ,
 खरंआहोत का आपण हि सुरक्षित ?
नेमका थोड्या दिवसाआधी  " पद्मावत " बघितला तेव्हा विचारांचे काहूर पेटले डोक्यात,
खरंच आहोत का आपणही सुरक्षित ?

किती वेळ लागतो आपल्याला नेगेटिव्ह विचार करायला अगदी क्षणभर हि नाही लगेच
वारे वाहू लागतात नेगेटिव्हिटीचे , त्यामुळे मनावर ताबा ठेवून थोडे प्रॅक्टिकली विचार करून
जेव्हा विचार करू तेव्हा आपण आपल्या समस्या सोडवू शकू . 
नेमके काय आहे "स्री "ना आपण मुळातच  खूप हळवी असते त्यामुळे तिला तिच्या
भावना लगेच मांडता येत नाहीत मात्र तिच्या डोळ्यातून तिला काय वाटले हे लगेच कळते .
पुरुषप्रधान संस्कृतीत आपण राहत आहोत , कितीही स्त्री वर्ग पुढे आला असला तरी समाजात
 वावरतांना आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच राहावे .आपल्या घरापासूनच सुरुवात करावी
मुलामुलींना सारखीच वागणूक द्यावी 

मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे . दोघांचेही अगदी वेगवेगळे स्वभाव , सवयी आहेत. 
आम्ही दोघांनाही सारखेच लाड करतो ,पण मुलीची जरा जास्तच काळजी घेतो हे मलाही वाटते .
 खरंच एवढे बिनधास्त मी तरी माझ्या मुलीला सोडेल असे मला वाटत नाही ,
नक्कीच अजून लहान आहेत दोघेही पण वेळ आल्यावर दोघानाही समजवून सांगणे गरजेचे आहे .
 कितीही मोर्डेन विचार आपण ठेवले तरी आपली "मुले " हि आपली जबाबदारी आहेत,
त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे आपले कर्त्यव्य आहे आणि जगाची ओळख त्यांना
आपल्या विचारातून होत असते , त्यामुळे आपण पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे आतापासून
त्यांना भ्रमिष्ट न करता ,त्यांना काय योग्य काय अयोग्य याचे शिक्षण  द्यायलाच हवे. 
मुलापेक्षा मुली ह्या खूप जिवाच्या आत असतात हे मात्र नक्की , त्यामुळे त्याची काळजी करणे ,
सुरक्षितता  पाहणे हेही साहजिकच.
तुमचीच सखी 
माझे पान  

मूल सुरक्षित आहे का ?



राजश्री कुलकर्णी यांचे '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 

राजश्री कुलकर्णी 
औरंगाबाद

थोडं बिनधास्त थोडं धडाडीने !

एका पुस्तकात वाचलं होतं....आपल्या विचारानुसार आपल्या भोवती व्हेवज निर्माण होतात आणि,,,आणि घटना घडत राहतात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा,,,,

       मला पटली ही गोष्ट आणि मी ती आत्मसात केली,,, हे ह्या विषयात सांगण्याचं कारण की रस्त्यावर चालताना काहीही होऊ शकतं तरी आपण काळजी घेऊन चालावं अस असलं तरी कुठेतरी काहीतरी घडतच पण म्हणून आपण रस्त्यावर चालणं सोडून देतो का हो?,,,, नाही ना.....मग हेच दोन्ही धोरण आपण मुली मोठया करताना बाळगू यात ना,,,कारण कस आहे आई गर्भ राहिल्यापासून निगेटिव्ह विचार करते मुलगी झाली तर कस होईल?कसं सांभाळावे? जग इतकं वाईट आहे,,,,मुलींचं अवघडच आहे?

        अरे असे निगेटिव्ह विचार करून आपण तेच तेच वातावरण निर्माण करतोय,,,,,अगदीच नाही असं नाही आहेत काही गोष्टी पण म्हणून काय तेच डोक्यात ठेवून जन्म देणार का आपण त्यांना?,,,,,आणि वाढवणारही तसच आयुष्य स्ट्रेस मध्ये ठेवून,,,,,

     मला मुलगी आहे,, मला माझ्या नातेवाईकांच्या सूचना ती 3 वर्षाची असल्या पासून तिला सांग कुठे कुठे हात लावू  द्यायचा नाही,,,,,अहो हो अजून तिला तर धड हाता पायांची ओळख होऊ द्या,,,,, माझी एक बहीण अनिमेटेड व्हिडिओ पाहून त्यात मुलींना कसे हात लावतात ते दाखवून बेचैन,,,,,फार अवघड असत ग कुठे कोणाकडे पाठवायचं नाही त्यांना सूचना द्यायच्या,,,,,,

      अग मान्य हे सगळं पण त्यासाठी आयांनी असंच होत हेच जग आहे हे जरा डोक्यातून काढा ,,,थोडं बिनधास्त थोडं धडाडीने हे आधी स्वीकार ही एक बाजू आहे जगात पण पॉझिटिव्ह जगपण खूप छान आहे,,, जगणं खूप सुंदर आहे,,,,

         सुरक्षित पूर्ण नसल्या तरी असुरक्षितच आहेत असेही नाही,,

        आपणपण एक स्त्री म्हणून मोठं होतोय आपले अनुभव बघा,,, आता जरी वाईट गोष्टी वाढत असल्या तरी सुविधापण किती आहेत,, मोबाईल आहेत ट्रॅकर aap आहेत,, महिला कायदे आहेत,,, मी रोज 100 किलोमीटर प्रवास करून जाते,,,माझ्या स्टाफमध्ये एकही लेडी नाही पण ते स्वीकारून पॉझिटिव्हली जेव्हा घेते तेव्हा त्रास होत नाही,,,

       असुरक्षितता नाही असं नाही पण आपण ती मिठा सारखी स्वीकारू तीच प्रमाण आपल्या विचारांनी वाढू देऊ नका ....

       थोडं पॉझिटिव्ह पणे आयुष्य जगू यात आणि मुलींना वाढवू यात म्हणजे या पॉझिटिव्ह व्हेवज कदाचित वाईट वृत्तीना मोडीत काढतील ,,,आणि मग ह्या चिमण्या आनंदाने कुठलीही भीती न बाळगता उंच उडतील 
         
एका मुलीची आई
                  🙂स्वप्ना

Wednesday, 14 February 2018

हवास तू......🌹

श्वास तू
ध्यास तू
जगण्याची माझी आस तू

सूर तू
ताल तू
श्वासांची माझ्या लय तू

शब्द तू
भावना तू
अंतरीचा माझा आवाज तू

श्रध्दा तू
भक्ती तू
मनमंदिरातील माझ्या परमेश्वर तू

स्वप्न तू
सत्य तू
सोनेरी क्षणांचा प्रत्येक किरण तू

आज तू
काल  तू
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मज संगे हवास तू
हवास तू......

🌹व्हैलेंटाइन स्पेशल🌹
🎈राजश्री प्रसाद कुलकर्णी🎈