मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Thursday 7 March 2019

अरे संसार संसार - बहिणाबाई


लपे करमाची रेखा 
माझ्या कुंकवाच्या खाली
 पुशिसनी गेल कुंकू
रेखा उघडी पडली 

परिस्थितीचे विदारक, सत्य चित्रण बहिणाबाई या कवितेतून होते. पूर्वीच्या  (१८८० ते १९५१) या काळात पतीच्या पश्चात समाजात वावरत मुलाला (सोपान चौधरी ) मोठे करताना शेतकरी कुटूंबातील या महिला कवयित्रीला जे जे सोसावे लागले . ते ते त्यांच्या साहित्यातून प्रतीत होताना दिसते. अशिक्षित , पण जगाच्या अनुभवातून खूप काही शिकलेल्या बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द मला त्यामुळेच भावतो.
आज स्त्री पुरुष समानतेच्या जागतिकीकरणाच्या युगातही विविध प्रसंगाना सामोरे जाताना , उंचविद्याविभूषित महिलेला, ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास त्यांच्या  काव्याच्या प्रत्येक ओळीतून प्रेरणा मिळेल असे वाटते. स्त्रीचे सौभाग्य , आधार, संरक्षण , साथ सारेच पतीच असतो. हे आज सारे विसरत चालले आहेत. शिक्षण आर्थिक , स्वालंबन , प्रसारमाध्यमे , झगमगाट यात स्त्री आपले कोमलत्व ,नैसर्गिक ऋजुता , वात्सल्य विसरत चालली आहे कि काय असे वाटते. तू तू मै  मै  च्या , बरोबरीच्या या काळात  सहचर्याचा अर्थ समर्पणाचा न राहता स्पर्धेचा होतोय. म्हणूनच बहिणाबाईंच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा मतितार्थ पुन्हा जाणून घ्यायची वेळ आली,असे वाटते.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
 फिरी येतं पिकांवर.

मानवी मनाच्या चंचलतेच किती समर्पक , यथार्थ या काव्य पंक्तीत सूचित केलेले आहे.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.

मनोव्यापरा विषयी आज खूप लिहल्या वाचल्या जात,पण या अशिक्षीत , स्वातंत्र्यपूर्व काळातील , विधवा स्त्री कडून जीवनाचे दर्शन घडते.
विभक्त कुटूंब पद्धती,प्रदूषण , मोबाईलचा अतिरेक वापर , पाश्चात्यांचे अंधानुकरण , यातील दिशाहीन युवापिढीस बहिणाबाईंच्या कविता योग्य दिशा दर्शवितात.
धरत्रीच्या कुशीमधी
 बीयाबियानं निजली,
वर्हेपसरली माटी
जशी शाल पांघरली.

सृजनाचा हिरवगार मोहक रूप जग पाहते पण त्यासाठी बियांना  जमिनीत गाडून घ्यावे लागते, जणू मातीची काळ्या मातीची - आईची मायेची शाल बियाणांची पांघरली आहे. सोसण्याशिवाय काही मिळत नाही. हा साधा संदेश  विसरत चालेल्या इन्स्टंटच्या जमण्यात युवापिढीस या कविता वाचण्यास , समजण्यास हव्यात.
साऱ्या जगाचं वास्तल्य सामावलेल्या आईच वर्णन बहिणाबाई करतात.

"माय भिमाई माउली,
 जशी आंब्याची सावली,
आम्हा इले केले गार,
स्वतः उन्हात तावली".

 डेरेदार , पानाफुलांनी भरलेल आंब्याचा झाडं  स्वतः ऊन,वारा  पाऊस सोसून पांथस्थाला गर्द सावली देते. वृद्धाश्रमाची आजची वाढलेली संख्या पाहता या मातेच्या प्रेमाचे संदेश आवश्यकच आहे , युवापिढीसाठी

 दोन्ही नाडा समदुर,
 दोन्हीमधी झीज एक,
दोन्ही बैलांचं ओढणं,
 दोन्हीमधी ओढ एक.

एकाच ओढीने , सारखेच झिजत मोट ओढणाऱ्या बैल जोडी प्रमाणे एकमेकांच्या सहाय्याने जीवनगड ओढत जावे , असेच हे काव्य सुचवते. कुटूंबात सर्वांची सुखदुःख एक असली की  कुटुंब एक राहते . प्रत्येक प्रसंगात सोबतीने मात करते. सर्वजण जमलेले , प्रत्येक आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त . गृहकलह वाढवतो.
मूल्य घसरत चाललेली, भारतीयसंस्कृती विसरत चाललेली यात मला वाटते. जीवनाचे तत्व, मूल्य सारे बहिणाबाई त्यांच्या काव्यातून सांगतात. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्याने कार्यक्रमाचे पेव फुटलेले असताना , खोलवर रुजणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचा पुन्हा अभ्यास व्हावा , असे वाटते .

माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

साऱ्यांचीच माउली असणाऱ्या विठ्लावर श्रद्धा ठेवून आपला, सर्वांचा जीवन प्रवास आनंददायी होवो .

काया काया शेतामंदी
 घाम जीरवं जीरवं,
तवा उगलं उगलं
कायामधून हिरवं. 

सर्व प्राणिमात्रांचे भरणपोषण करणाऱ्या बळीराजाला घामातून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या श्रमाचे मोल आज मिळत नाही. कष्टाला पर्याय नाही हे आज लक्षात नाही , म्हणून मला बहिणाबाईंच्या प्रत्येक काव्यपंक्तीतील विचाराचा आज पुन्हा विचार व्हावा असे वाटते !

सौ . संध्या सुधीर पिपंळकर
औरंगाबाद

महिला संत- संत वेणाबाई


        'जय जय रघुवीर समर्थ' ही आरोळी ऐकून एक बारा-तेरा वर्षांची मुलगी समर्थ रामदासस्वामींसमोर आली.
''आपण माझ्याकडून भिक्षा घ्याल ना ?"
हा प्रश्न ऐकून आणि त्या मुलीकडे पाहून समर्थ काय समजायचे ते समजले आणि म्हणाले,"का नाही घेणार ? जरूर घेईन.."
ती मुलगी धावतच आत गेली आणि भिक्षा घेऊन आली. तिच्यापाठोपाठ एक मध्यमवयीन स्त्री पण बाहेर आली. दोघींनी समर्थांना
नमस्कार केला. समर्थ पुढे निघून गेले.
            ही बारा-तेरा वर्षांची मुलगी म्हणजे कोल्हापूरच्या राधाबाई व गोपजीपंत गोसावी यांची मुलगी....वेणाताई. हिचे लग्न मिरजेच्या देशपांडे यांच्या मुलाबरोबर झाले. पण संसार म्हणजे काय ? हे कळायच्या आतच काळाने तिच्या नवऱ्यावर झडप घातली. आणि वेणाताई बालविधवा झाली.
          त्याकाळी एकंदर स्त्रीजीवनच अवघड होते. कारण परकीय सत्ता, परकीय आक्रमण यांच्यामुळे स्त्रियांवर अनेक बंधने होती. आणि ती बंधने योग्यही होती. त्यातून बालविधवा म्हणजे तर बंधनांचे पाश अजूनच घट्ट आवळले जात. घरचाच काय, पण स्वयंपाकघराचा उंबरठाही ओलांडण्याची त्यांना परवानगी नसे. अशा परिस्थितीत वेणाबाई अडकली.
            अशीच एकदा तुळशीवृंदावनाजवळ एकनाथी भागवत वाचत बसलेली असतांना समर्थांची हाक ऐकू आली. तिने भिक्षा घातली. पायावर डोके ठेवले. घरातून सासू आली. तिने समर्थांना आपली व्यथा सांगितली. समर्थांनी वेणाबाईंना 'काय वाचतेस ?' असे विचारले. तिने 'एकनाथी भागवत वाचते,' असे सांगितले. समर्थांनी 'वाचतेस ते समजते का ?' असे विचारले. तेव्हा वेणाबाईंनी  समर्थांना वाचनातील जे समजले नव्हते, त्याबद्दल काही प्रश्न विचारले.  समर्थांनी त्यांची उत्तरे सांगितली. त्यांचे ज्ञान, वक्तृत्व यांनी वेणाबाई प्रभावित झाल्या. त्यांनी समर्थांना आपले गुरु मानले.
        पुढे वेणाबाईंना त्यांच्या सासरच्यांनी त्यांच्या माहेरी आणून सोडले. गोसावी हे समर्थांचे अनुग्रहित होते.त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला ते जात असत. सोबत वेणाबाईही जात असत. समर्थांचे मार्गदर्शन वेणाबाईंना जीवनाचा मार्ग दाखवणारे ठरले. निराश आयुष्याला रामरायाच्या रूपाने आशेचा किरण दिसला.
        पुढे आईवडिलांनी विचार करून वेणाबाईंना समर्थांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.


देह माझे मन माझे। 
सर्व नेले गुरुराजे।। 

अशी अवस्था वेणाबाईंची होती. त्यात आईवडिलांच्या निर्णयाने त्या सुखावल्या.

       समर्थ रामदासांनी वेणाबाईंची अध्यात्मिक आवड, बोलण्याची शैली हे पाहून त्यांच्याकडून अध्यात्मिक अभ्यास करून घेतला. त्याकाळी समर्थांकडे अशा तीन बालविधवा, पण कर्तृत्ववान अशा तीन स्त्रिया होत्या. एक अक्काबाई , अंबिकाबाई आणि वेणाबाई यांच्याकडून समर्थांनी अध्यात्मिक अभ्यास करून घेऊन त्यांना मठाधिपती नेमले.
          त्यात मिरजेच्या मठाची जबादारी वेणाबाईंवर होती. शिवाय चाफळच्या रामनवमीच्या उत्सवाची जबादारी वेणाबाईंवर होती. वेणाबाईचा आवाजही चांगला होता. त्यांच्या अंगीचे हे गुण जाणून समर्थांनी त्यांना कीर्तन कसे करावे हे शिकवले. एकदा समर्थ त्यांना म्हणाले "आज येणाऱ्या भाविकांसमोर तुम्ही कीर्तन करा." वेणाबाई घाबरल्या. कारण विधवा स्त्रीने कीर्तन करणे अशुभ मानले जाई. तिचे दर्शनच अशुभ, तिथे तिचे कीर्तन कोण ऐकणार? पण समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची आज्ञा दिली. नाईलाजाने त्या कीर्तनाला उभ्या राहिल्या. स्वतः स्वामी कीर्तन ऐकायला येऊन बसले. वेणाबाईंचे डोळे पाणावले, पण स्वतःला सावरून त्यांनी उत्तम कीर्तन केले. समर्थ खुश झाले. पण समाजकंटकाना हे रुचले नाही. त्यांनी संधीचा फायदा घेऊन वेणाबाईंवर विषप्रयोग केला,पण त्या तेही पचवून उभ्या राहिल्या. त्यांची ही खंबीर मनोवृत्ती पाहून समर्थांनी शिष्येची पाठ थोपटली.

           वेणाबाईंनी अनेक ग्रंथरचना केल्या. त्यात 'उपदेशरहस्य', 'पंचीकरण', 'रामगुहक संवाद', 'रामायणाची कांडे', 'सीतास्वयंवर' तसेच काही अभंगपदे यांच्या रचना केल्या. वेणाबाईंवर समर्थांच्या लिखाणाचा प्रभाव असल्याने ही काव्ये तशीच  यमक प्रधान  आहेत.
           वेणाबाईंवर चाफळच्या रामनवमीच्या  उत्सवाची जबाबदारी असे. एकदा या उत्सवाच्या आधी पंधरा दिवस वेणाबाईंना खूप ताप आला. सर्व कामे खोळंबली. धान्य निवडणे, लोणची, पापड यांची व्यवस्था पाहणे... ही काहीही कामे होईनात. तापामुळे अंगात उभं राहायचीही ताकद नव्हती. तेव्हा शिष्याना सांगून रामापुढे स्वतःला खांबाला बांधून घेऊन त्या रामाची करुणा भाकू लागल्या.


पतित पावन जानकी जीवना 
अरविंदनयना रामराया... ll
अक्का गावा गेली, मज व्यथा झाली 
दयाळा राहीली नवमी तुझी...ll
आक्का गावा जाता, ऐका सीताकांता ll
वेणीच्या आकांता पावा वेगी ll
नवमी समारंभ पाहू द्या बरवा,
मग देह राघवा, जावो-राहो ll

ही करुणा इतकी आर्ततेत त्या म्हणत होत्या की,


ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा,
मूर्तीच्या नयना अश्रू आले ll
ऐकुनी वचन पतित पावन,
कृपेसी पात्र वेणी केली ll

त्यांची करुणा ऐकून रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रुधारा येऊ लागल्या. रघुपतीच्या गळ्यातील माळ वेणाबाईंच्या गळ्यात पडली. समर्थ हे सारे पहात होते. ते वेणाबाईंना म्हणाले, "देहाच्या ममतेस्तव देवाला संकटात का घालतेस ?"
वेणा उत्तरली," उत्सवात अडथळा नको म्हणून.... देहाचा मोह नाही."
          या दरम्यान रामबाई नावाची एक बाई वेणाबाईंच्या मदतीला आली. ती 'बत्तीस शिराळ्याहून समर्थांनी मला पाठवले,' असं म्हणाली. तिने सर्व तयारी केली. समर्थ आले. त्यांनी सांगितले की, "मी असं कुणालाही पाठवले नाही,"
           त्या रामबाईचा शोध घेतला, तेव्हा ती सापडली नाही. सगळेजण काय समजायचे ते समजले.
           वेणाबाईंना आता पैलतीर दिसत होता. समर्थ चाफळला आले आहेत, हे कळल्यावर त्या मिरजेहून चाफळला आल्या. त्यांनी समर्थांना विनंती केली,"मला आता आज्ञा द्यावी," पण समर्थ टाळाटाळ करत होते. रोज वेणाबाईंचा एकच धोसरा,"स्वामी मला आज्ञा द्या,"
           एके दिवशी समर्थ म्हणाले, "ठीक आहे, आज निरोप देऊ. समर्थांनी शिष्याना सांगून वेणाबाईंचे जेवणाचे पान आपल्या पानाच्या बाजूला मांडले. चार वाजता वेणाबाई कीर्तनाला उभ्या राहिल्या. समर्थांसह सर्वजण देहभान हरपून ऐकत होते. कीर्तन झाले, आरती झाली. वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवले.
         तेव्हा समर्थ म्हणाले,"आता माहेराला जावे," हे शब्द कानी पडताच 'जय जय रघुवीर समर्थ... सद्गुरू महाराज की जय...' असं म्हणून वेणाबाई खाली कोसळल्या.
            वेणाबाईंची समाधी जिथे आहे, तिथे चंपकवृक्ष उगवला आहे. त्याची फुलं घेऊन समर्थ रामाची पूजा करत असत.
              धन्य त्या वेणाबाई !
स्त्रियांसाठी असलेली अतिशय अपमानकारक आणि प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या नशिबात आली असली तरी भक्तिमार्गाने त्यांनी आपले जीवन कंठले. आणि नंतर आपल्या गुरूंची समर्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्यासमोर देह ठेवला.

मनीषा भास्कर जोशी
औरंगाबाद